महाराष्ट्र ठाकरेंच्या मागेच; नाशिकच्या मोर्चात संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

    12-Sep-2025
Total Views |
 
sanjay raut
  (Image Source-Internet)
नाशिक :
नाशिकमध्ये पार पडलेल्या जन आक्रोश मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते एकत्र आले. या वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत महाराष्ट्र फक्त ठाकरेंच्या मागेच जाणार असल्याचा दावा केला.
 
राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात दिवसेंदिवस भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि कायदा-सुव्यवस्था कोसळत चालली आहे. नाशिकमधील तरुण राहुल धोत्रेच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या सुरक्षिततेला गंभीर धोका दर्शवते.”
 
मोर्चात सहभागी झालेल्या मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रितपणे ठराव घेतला की यापुढे नाशिकसह संपूर्ण राज्यात संयुक्त मोर्चे काढले जातील. राऊत यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधूंचा हा एकत्रित आवाज महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल घडवून आणेल.
 
या आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून समर्थन दिले. मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक समस्यांसोबतच राज्यातील वाढत्या गुन्हेगारी व भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आवाज उठवण्यात आला.