(Image Source-Internet)
नांदेड :
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा (Heavy rains) सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे गावोगाव पाणी शिरले असून प्रशासनाने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. पूरस्थिती गंभीर झाल्याने लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 93 पैकी तब्बल 69 मंडळांत मुसळधार पाऊस झाला आहे. कंधार आणि माळाकोळी या मंडळांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी आणि आसना नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक गावांत पाणी शिरले आहे. परिणामी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सीआरपीएफ, महानगरपालिका आणि स्थानिक पथकं बचावकार्यासाठी सज्ज झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर लष्करी बटालियनलाही तातडीने पाचारण करून बचाव मोहिमेला गती देण्यात आली आहे. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव तालुके सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
आतापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विष्णुपुरी प्रकल्प, बळेगाव बंधारा आणि लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे लाखो हेक्टर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरं कोसळली असून जनावरांची हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूरस्थिती उद्भवली आहे. नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. लष्कराची मदत घेण्यात आली असून जिवीतहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना सुरू आहेत.