महाराष्ट्र सरकारची गणेशभक्तांना मोठी भेट; महामार्गांवरील टोल शुल्क माफ

    22-Aug-2025
Total Views |
 
Ganesh devotees Toll charges
 (Image Source-Internet)
मुंबई :
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा २३ ऑगस्टपासून ते ८ सप्टेंबरपर्यंत गणेशभक्तांची वाहने आणि राज्य परिवहनच्या बसांना टोल (Toll) भरावा लागणार नाही.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केले की, मुंबई–बंगळुरू आणि मुंबई–गोवा या दोन राष्ट्रीय महामार्गांवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या अखत्यारीतील रस्त्यांवर ही टोल माफी लागू असेल.
 
गणेशोत्सवासाठी विशेष टोल-फ्री पास
सरकारकडून ‘गणेशोत्सव २०२५ टोल-मुक्त पास’ जारी करण्यात येणार आहे. या पासमध्ये वाहन क्रमांक आणि वाहनमालकाचे नाव नमूद असेल. हे पास आरटीओ कार्यालये आणि पोलिस विभागामार्फत उपलब्ध करून दिले जातील. विशेष म्हणजे, हा पास भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठीही वैध असेल.
 
शहर व ग्रामीण पोलिसांसह आरटीओ अधिकाऱ्यांना भाविकांना वेळेत पास वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये.