मुंबई मराठींचीच राहणार, गुजरातींच्या हातात देणार नाही; संजय राऊत यांची ठाम भूमिका

    16-Aug-2025
Total Views |
 
Sanjay Raut
 (Image Source-Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप तसेच ठाकरे बंधूंच्या राजकीय हालचालींवर तीक्ष्ण भाष्य केले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण महापालिकांमध्ये मनसे–शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आणि इतर विविध उपक्रमांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिकमध्ये होणाऱ्या विराट मोर्चामध्येही मनसेसोबत चालण्याचे संकेत राऊतांनी स्पष्ट केले.
 
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्याशी संबंधित व्यापारी गट मुंबईवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ठाकरे बंधूंचे उद्दिष्ट ठाम आहे – मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती मराठींच्याच हातात टिकली पाहिजे. ती गुजरातींच्या ताब्यात देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
 
दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या ‘लॉटरी’ या वक्तव्यावरही राऊतांनी उपरोधाने टीका केली. ते म्हणाले, “लॉटरी हा शब्द सन्मानाचा आहे, पण महाराष्ट्रात सध्या मटकाच सुरू आहे. मुख्यमंत्रिपद हे लॉटरीवर नाही, तर मटक्यावर लागलेले दिसते. गणेश नाईक यांनीही तोच अर्थ अभिप्रेत ठेवला असावा. मात्र मटक्याचे आकडे कायमचे नसतात, ते सतत बदलत राहतात.”
 
यासोबतच भाजप नेते गिरीश महाजन यांनाही राऊतांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले, “महाजन हे महर्षी व्यास नाहीत. उद्या सत्ता गेल्यानंतर त्यांची काय अवस्था होईल याचा विचार त्यांनी करायला हवा. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्यास, फडणवीसांच्या भोवती फिरणारे चोर-डाकू सत्तेशिवाय रस्त्यावरही दिसणार नाहीत,” अशा शब्दांत राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला.