(Image Source : Internet)
नागपूर :
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी हा निर्णय काँग्रेस पक्षाच्या दीर्घकालीन मागणीचा आणि राहुल गांधी यांच्या प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगितले. त्यांनी या जनगणनेची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी होण्याची मागणी केली.
सपकाळ यांनी नमूद केले की, भाजपने या निर्णयाकडे केवळ राजकीय घोषणा म्हणून न पाहता, देशहितासाठी त्याची अंमलबजावणी गांभीर्याने करावी. ही जनगणना केवळ आकड्यांची नोंद नसून, समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाकिस्तानविरोधी “चुन चुन के बदला लेंगे” या वक्तव्यावरही सपकाळ यांनी मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणाऱ्या प्रत्येक निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष सरकारसोबत राहणार आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत करत, तो सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. सपकाळ यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी ही जनगणना पारदर्शक आणि वेळेवर राबविणे गरजेचे आहे.