(Image Source : Internet)
मुंबई:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत मृतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या आर्थिक मदतीसोबतच राज्य सरकारने संबंधित कुटुंबीयांच्या शिक्षण व रोजगाराची जबाबदारी उचलण्याचं आश्वासनही दिलं आहे.
संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी-
या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत त्यांच्या मुलीस शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेतला. “कालच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, आज मी मुख्यमंत्री म्हणून माझा विशेषाधिकार वापरून तिची नियुक्ती करतो,” असं फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं.
दहशतवादाविरोधात राज्याचा ठाम पवित्रा-
राज्य सरकारचा हा निर्णय पीडित कुटुंबांसाठी केवळ आधार नसून, दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेण्याचं प्रतीक मानला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.