(Image Source : Internet)
मुंबई :
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या दहशतवादावर केलेल्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी वडेट्टीवार यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवत, त्यांच्या विधानास ‘देशविरोधी मानसिकतेचे प्रतीक’ असे संबोधले आहे.
वडेट्टीवारांचे चर्चित विधान-
एका पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी 'दहशतवाद्याचा कोणताही धर्म नसतो' असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभक्त नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत असंवेदनशील ठरत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा कठोर निषेध-
चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हटले की, “काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे असंख्य पुरावे आहेत. अशा परिस्थितीत वडेट्टीवार कोणाच्या दबावाखाली असे विधान करतात?” असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसने दहशतवाद्यांचे समर्थन करून देशविरोधी वृत्तीचे दर्शन घडवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपचा जनतेला संदेश-
देशप्रेमी नागरिकांनी वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानाचा जोरदार निषेध करावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याची गरज आहे.वडेट्टीवार यांच्या विधानावरून काँग्रेसला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असून, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.