महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; नागपूरसह राज्यभर ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा,धुळे सर्वात थंड!

    19-Nov-2025
Total Views |
- मुंबईत तापमानात मोठी घसरण

Cold wave warningImage Source:(Internet) 
नागपूर :
हिवाळ्याची चाहूल आता प्रत्यक्षात जाणवू लागली असून महाराष्ट्रात सर्वत्र कडाक्याची थंडी (Cold) पडू लागली आहे. उत्तरेकडील राज्यांत सुरू असलेल्या व्यापक हिमवर्षेचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होऊ लागल्याने तापमानात झपाट्याने घसरण झाली आहे. अनेक शहरांत पहाटेपासूनच दाट धुके व गारठा अनुभवायला मिळत असून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे.
 
धुळे सर्वात थंड; तापमान तब्बल 6.2°C-
राज्यातील सर्वाधिक थंडीचा विक्रम यंदा धुळे जिल्ह्याकडे गेला आहे. येथे किमान तापमान 6.2°C इतके नोंदवले गेले असून स्थानिक नागरिकांना थंडीची झळ तीव्रतेने जाणवली.
 
नाशिकमध्ये 9.2°C, पुण्यात 9.4°C, तर कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि महाबळेश्वर परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर गारठा जाणवत आहे.
 
नागपूरमध्येही गारठ्याचा जोर वाढला-
विदर्भाची राजधानी नागपूरसुद्धा थंडीने गारठली आहे. शहरातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदवली गेली असून पहाटेच्या सुमारास थंडगार वाऱ्याची झुळूक अधिक तीव्र झाली.
 
नागपूरच्या आसपासच्या कन्हान, परतवाडा, उमरेड, कळमेश्वर भागातही रात्रीच्या वेळी तापमानात लक्षणीय घट जाणवत असून नागरिकांनी आधीच उबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे.
 
आठ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’; कोल्ड वेव्हचा इशारा-
भारतीय हवामान विभागाने राज्यातील धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा जारी केला आहे.
 
पुढील 1-2 दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
मुंबईतही नोंदला हिवाळ्याचा कडाका-
सामान्यतः कोकणात कमी जाणवणारा गारवा यंदा मुंबईतही वाढला आहे.
 
सांताक्रूझ वेधशाळेच्या नोंदीनुसार मुंबईत १७.४°C किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. ही हंगामातील आतापर्यंतची सर्वात कमी नोंद आहे.
 
नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन-
थंडीच्या अचानक वाढलेल्या तीव्रतेमुळे प्रशासनाने नागरिकांना खालील सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 
उबदार कपड्यांचा वापर वाढवावा
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी
रात्री व सकाळच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळावा
दिर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
 
२२ नोव्हेंबरला पावसाची शक्यता-
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने २२ नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
यंदा गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक थंडी पडण्याची शक्यता असून हिवाळा फेब्रुवारीपर्यंत लांबण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.