राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 'आखरी सवाल' चित्रपट शताब्दी वर्षानिमित्त एप्रिल २०२६ मध्ये होणार प्रदर्शित

    08-Oct-2025
Total Views |
Aakhri Sawal
 
नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षे पूर्ण केल्यानिमित्त संघाच्या संपूर्ण प्रवासावर आधारित 'आखरी सवाल' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. निखिल नंदा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१९) विजेते, संघाचे स्वयंसेवक अभिजित मोहन वारंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा १०० वर्षे पूर्ण केले. नागपूरकरांनी संघाचा हा संपूर्ण प्रवास अत्यंत जवळून पहिला आहे. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चारित्र्य घडविण्याच्या चळवळीपासून सुरुवात करून आज राष्ट्रनिर्माण, सामाजिक कार्य आणि आपत्ती निवारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९४८, १९७५ आणि १९९२ मध्ये संघावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, प्रत्येक वेळी संघ अधिक बळकट होऊन पुढे आला. शाळा उभारणी, पूल बांधणीपासून ते नैसर्गिक आपत्तीतील मदत कार्यापर्यंत संघाने अनेक क्षेत्रांत काम केले आहे. तरीदेखील संघ सतत वादाच्या भोवर्‍यात राहिला आहे. हा संपूर्ण प्रवास निखिल नंदा मोशन पिक्चर्स या बॅनरखाली मांडण्यात येतो आहे. या महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील विविध ठिकाणी सुरू होणार आहे. तर, चित्रपटाचा जागतिक प्रीमियर २०२६ च्या सुरुवातीला, तर संपूर्ण देशात एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शन होणार आहे.
 
दुर्मिळ दृश्यांचा समावेश
 
संघाबाबत काहींना ती 'दहशतवादी संघटना' देखील वाटते, तर समर्थकांच्या मते तो भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. स्वयंसेवकांची खाकी गणवेशातील शाखा ही संघाची पारंपरिक प्रतिमा असली तरी त्यामागे असलेली शिस्त आणि सेवा वृत्ती हा चित्रपट उलगडणार आहे. लेखक उत्कर्ष नायथानी यांनी लिहिलेल्या या कथानकात नाट्यकथन, दुर्मिळ संग्रहित दृश्ये आणि प्रत्यक्ष अनुभवांचे निवेदन यांचा समावेश आहे.
 
हा चित्रपट म्हणजे केवळ कथानक नसून संघाबद्दल शतकभर विचारल्या जाणाऱ्या 'आखरी सवाल'चे उत्तर आहे. संघाचा हा नागपूरपासून जागतिक प्रवासापर्यंतचा अत्यंत धैर्यशील आणि सेवाभावी प्रवास आम्ही या चित्रपटात मांडला आहे, असे निर्माते निखिल नंदा म्हणाले.