चिचपल्लीतील नागरिकांचे हाल होऊ देणार नाही

    23-Jul-2024
Total Views |
- सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

Sudhir Mungantiwar 
चंद्रपूर :
अतिवृष्टीमुळे चिचपल्ली येथील जवळपास ३०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ताबडतोब भाजपा पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना धान्य कीट, छत्री, ब्लँकेट यांचे २२ (सोमवार) वाटप करण्यात आले. यावेळी दूरध्वनीवरून मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधत मी पूर्ण शक्तीने आपल्या सोबत आहे, असा विश्वास दिला.
 
दोन दिवसांपूर्वी चिचपल्ली येथील नागरिकांनी जवळपास ३०० घरात पाणी शिरल्याची माहिती मुनगंटीवार यांना फोन करून दिली. मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता पहाटेच फोन करून प्रशासनाला कामी लावले. मदतकार्य पोहोचविण्याचे आदेश दिले. पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही घटनास्थळी जायला सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांना धान्य कीट, छत्री, ब्लँकेट पोहोचविण्यात आले. चिचपल्ली येथील नागरिकांशी मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
 
‘मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत आहे. काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही. गावाला शासकीय मदत मिळावी, यासाठी मी निर्देश दिले आहेत. आणि लवकरच मी तुमच्या भेटीला येणार आहे,’ असे मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, माजी जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, सरपंच पपीता कुंभरे, उपसरपंच चंदन उंचेकर, इमरान पठाण, प्रसिनजीत निमगडे यांची उपस्थिती होती.