पूरबाधित गावातील नागरिकांच्या अडचणी त्वरीत सोडवा

    22-Jul-2024
Total Views |
- जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय यंत्रणेला निर्देश
- जिल्ह्यात 778 गावे बाधित; 11229 हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज

Collector Vinay Gowda 
चंद्रपूर :
गत दोन दिवसात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. प्रादेशिक हवामान खात्याने अजूनही जिल्ह्याला अतिवृष्टी व सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन पूर पीडितांच्या मदतीसाठी तत्पर असून तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणेने पूरबाधित गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी दिले.
 
जिल्ह्यातील पूरपरिस्थतीचा आढावा घेण्यासाठी वीस कलमी सभागृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.