मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांना संधी मिळावी

    18-Jul-2024
Total Views |
 
Ajit Kumhar
 
अकोला :
अकोला जिल्ह्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनें'तर्गत जास्तीत-जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केले.
 
राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ची नुकतीच घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके व इतर अधिकारी उपस्थित होते.
 
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’राज्यात राबविली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी अकोला जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने योजनेचा व्यापक प्रसार व प्रभावी संघटित प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
 
या योजनेंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. १२वी उत्तीर्ण युवकांना प्रती महिना ६ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. आय.टी.आय. तसेच पदविकाधारक युवकांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रती महिना १० हजार रुपये विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
 
उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापनांना या योजनेच्या माध्यमातून मनुष्यबळ मिळणार असून त्यांना शासनाच्यावतीने विद्या वेतन मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील संबंधित आस्थापना व उमेदवारांना https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.
 
तालुका स्तरावर व जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्या आणि इच्छुक उमेदवारांची या योजनेसाठी नोंदणी होण्याच्या दिशेने संबंधित शासकीय यंत्रणांनी कार्य करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
 
योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी व आधार नोंदणी असावी. उमेदवार एचएससी/आयटीआय,पदवीकाधारक तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला, तसेच http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केलेली असावी. शिक्षण सुरु असलेले उमेदवार या योजनेकरीता पात्र नाहीत. वय १८ ते ३५ वर्ष असावे. उमेदवाराचे स्वत:चे नावे बॅक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराचे कार्य प्रशिक्षण कालावधी हा ६ महिन्याचा राहील.